रत्नागिरी: राज्यातील काही भागात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणे भरून वाहत आहेत. मंगळवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरणाची भिंत फुटून पाणी गावात शिरल्याने ३० नागरिक वाहून गेले. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य व्यक्तींचा शोध एनडीआरएफच्या टीममार्फत घेण्यात येत आहे.
रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण बेपत्ता झाले आहे. सहा मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. या ठिकाणी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या घटनेचा फटका बसला आहे. ही घटना समजताच वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि अभियंते घटनास्थळी दाखल झाले आहेत. धरण फुटल्याने ओवळी, रिक्टोली, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी संपर्क तुटला आहे. कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. या पावसाचा जोर इतका वाढला की तिवरे धरण फुटले आहे. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने एका बाजूला भगदाड पडले आहे. त्यामुळेच शेजारील गावांमध्ये सतर्कतेचा इशाराही दे्ण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत. २००० साली या धरणाचे काम पूर्ण झाले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या धरणाच्या दुरूस्तीकडे कोणतेही लक्ष देण्यात आलेले नव्हते अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.